महाविकास आघाडीकडे (MVA) कर्नाटक (Karnatak) आणि तेलंगणातूनच (Telangana)नव्हे तर परदेशातूनही पैशांचा ओघ येण्याची शक्यता किरण पावसकर यांनी वर्तवली आहे. कर्नाटक आणि तेलंगणाची बॉर्डर सील करा अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी बुधवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर विविध पक्षांचे नेते आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहे.
महाविकास आघाडीकडे कर्नाटक आणि तेलंगणातून नव्हे तर परदेशातूनही पैसा येत आहे. या पैशांचीही चौकशी होणे आवश्यक आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडे निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत याच दोन राज्यांतून महाराष्ट्रात पैसा आला होता. याचा फटका महायुतीला बसला. त्यामुळे कर्नाटक आणि तेलंगणाची बॉर्डर सील करण्याची गरज आहे, असे पावसकर म्हणाले. कुठेतरी छोटी रक्कम पकडल्याचे दाखवायचे आणि मोठे घबाड यांच्याच घरी पाठवायचे असा प्रकार सुरु आहे, असे ते म्हणाले.