News Bharati

पातळी सोडण्यास भाग पाडू नये; श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरे गटाला इशारा

महाराष्ट्र : “आमच्याकडे शिव्यांची खूप मोठी डिक्शनरी आहे. परंतु आमच्यावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि आई – वडिलांचे संस्कार आहेत. म्हणून आम्ही पातळी सोडत नाही. आम्ही टीकेला कामातून उत्तर देत असतो. त्यामुळे विरोधकांनी आम्हाला पातळी सोडण्यास भाग पाडू नये”, असा इशारा श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दिला. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाण्यात (Thane) आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत डॉ. श्रीकांत शिंदे बोलत होते.

दरम्यान “गेल्या दहा वर्षात मतदारसंघासाठी हजारो कोटींचा निधी आणला आहे. शहरांचा चेहरा बदलत चालला आहे. येणाऱ्या काळात या शहराचा चेहरा अजून बदलेल. आणि ही शहरे मुंबईसारखी विकसित होतील”, असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

तसेच, काही लोक ज्या आघाडीमध्ये गेले. ते आघाडीची भाषा बोलायला लागले आहेत. आज पराभव डोळ्यासमोर दिसल्यानंतर गलिच्छ भाषा राजकारणात आणण्याचे काम काही लोकांनी केले. महाराष्ट्राने अशी कधी भाषा पाहिली नव्हती. इतक्या खालच्या स्तरावर राजकारण आणून ठेवले. सकाळपासून ते रात्रीपर्यंत शिव्या शाप देण्याचे काम करत असल्याची टीका यावेळी श्रीकांत शिंदे यांनी केली.

काही लोक ठाणे, कल्याण मधून निवडणूक लढण्याच्या वलग्ना करत होते. पण वेळ आली तेव्हा पळून गेले. “तू लढो हम कपडा संभालते है”, अशी त्यांची वृत्ती असल्याचा टोला त्यांनी लगावला. ठाणे आणि कल्याणमधून महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही यावेळी श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *