News Bharati

दंगलखोरांचे लांगुनचालन करणाऱ्यांना जनता माफ नाही करणार

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान ऊर्फ मामू यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘उबाठा’ गटात प्रवेश केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पक्षप्रवेशावर राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. \”मतांच्या लांगूलचालनासाठी उद्धव ठाकरे कोणत्या थराला जाऊ शकतात, हे आता उघड झाले आहे,\” अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

\”हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने मतांचे लांगूलचालन करण्यासाठी रशीद मामूसारख्या व्यक्तीला प्रवेश दिला आहे. यातून त्यांचे चरित्र आणि त्यांची दिशा स्पष्ट होते. आता त्यांना लांगूलचालन करायचे आहे. विशिष्ट लोकांचे जोडे चाटून त्यांची मते मिळवायची आहेत. पण जनता हे बघते आहे. देशप्रेमी, देशभक्त आणि राष्ट्रवादी लोक हे पाहत असून त्यांना याचे नुकसान सहन करावे लागेल.\”

बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली?

देवेंद्र फडणवीस यांच्या या टीकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रशीद मामू यांच्यावर असलेले विविध आरोप आणि त्यांची पार्श्वभूमी पाहता, त्यांना पक्षात घेणे म्हणजे बाळासाहेबांच्या ‘ज्वलंत हिंदुत्वा’च्या विचारांना हरताळ फासणे आहे, अशी भावना भाजप समर्थकांकडून व्यक्त होत आहे. सत्तेसाठी आणि काही विशिष्ट समुदायाची मते मिळवण्यासाठी उबाठा गट देशविरोधी मानसिकतेच्या लोकांसोबत हातमिळवणी करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

मुंबईच्या सुरक्षिततेसाठी आणि अस्मितेसाठी ‘राष्ट्र प्रथम’ मानणारा भाजप हाच एकमेव पर्याय असल्याचे यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आगामी निवडणुकीत मुंबईकर या ‘लांगूलचालनाच्या’ राजकारणाला चोख उत्तर देतील, असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.