News Bharati

कलम ३७० आम्ही पुन्हा लागू करून देणार नाही

जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० मुळे संविधान लागू होत नव्हते किंवा आरक्षण दिले जात नव्हते. पण ते कलम काढल्यामुळे आता मागासवर्गीय नागरिकांना आरक्षणाचा लाभ मिळत आहे. आता काँग्रेस तेथील नागरिकांचे आरक्षण बंद करण्यासाठी धडपड करत आहे. कलम ३७० आम्ही त्याठिकाणी पुन्हा लागू करून देणार नाही.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात आपल्या देशाच्या जमिनीवर कोणीही अतिक्रमण करू शकत नाही किंवा देशाची जमीन हिस्कावून घेऊ शकत नाही असे ठाम प्रतिपादन संसदीय कार्य मंत्री डॉ. किरण रिजिजू यांनी केले. 

देशाच्या स्वातंत्र्यानंतर ‘संविधान दिवस ‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशात प्रथम सुरू केला. ७५ वर्ष मुस्लिम समाजाचा काँग्रेसने व्होट बँक म्हणून राजकारणात वापर केला. काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी नेहमी जात व धर्म याबाबत राजकारण केले आहे. राहुल गांधी प्रगल्भ नेते म्हणून कधी उदयास आले नाहीत. कारण त्यांच्या अंतर्मनात कधी तशी भावना निर्माण झाली नाही. अमेरिकेमध्ये जाऊन देशाला शिव्या देऊन कोणी नेता होऊ शकत नाही, अशा शब्दात

संसदीय कार्य मंत्री डॉ. किरण रिजिजू यांनी काँग्रेसवर टीका केली. पुण्यात आयोजित परिषदेत ते बोलत होते.
देश जनतेचा असून कोणत्या एका परिवाराचा नाही. काँग्रेससाठी एक परिवार महत्त्वाचा आहे, पण आमच्यासाठी देश प्रथम आहे. काँग्रेसच्या काळात गरीब देश म्हणून भारताला हिणवले जात होते. पण नरेंद्र मोदी यांच्या काळात बदल होऊन देशाचा मान जगात वाढला आहे, असेही ते म्हणाले. 

महायुतीला राज्यात बहुमत मिळेल
डॉ. किरण रिजिजू म्हणाले, पुण्यात येणे मला खूप आवडते. कारण हे ऊर्जेचे केंद्र आहे. महाराष्ट्रामधील निवडणूक देशाचे दृष्टीने महत्त्वाची आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई असून देशात उद्योग निर्मितीचे केंद्र महाराष्ट्र आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत अनेक गोष्टी बदललेल्या आहेत. काँग्रेसला लोकसभेमध्ये जनतेची दिशाभूल करून काही मते मिळाली होती, पण आता त्यांचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे त्यांना आता जनतेचे समर्थन मिळणार नाही. महायुतीला राज्यात बहुमत मिळेल असे सध्या दिसत आहे. 

मुंबईमध्ये मी अनेक वर्ष येत आहे. आज मुंबई जागतिक शहर बनले आहे. अनेक पूल, उड्डाणपूल, बोगदे, रस्ते यामुळे मुंबईचा चेहरा मोहरा बदलला आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर देखील जवळ आले आहे. लाडकी बहिण योजनेमुळे महिलांना आर्थिक आधार मिळाला असून त्या खूश आहेत. गरिबांना देखील न्याय देण्याचे काम सरकारने केले आहे. काँग्रेसचा गट यामुळे अस्वस्थ होऊन त्यांनी काही घोषणा सुरू केल्या. पण त्यावर आता मतदारांचा विश्वास नाही. गरीबी हटाओ नारा काँग्रेसने दिला पण त्याची पूर्तता मोदी सरकारने केली, असेही डॉ. रिजिजू यांनी सांगितले. 

सीमावर्ती भागात मी राहतो. अनेक भागात रस्ते अस्तित्वात नव्हते. मोदी यांनी पक्के रस्ते सर्व ठिकाणी तयार करून पायाभूत सुविधा निर्माण केल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागपूरमध्ये बनावट पुस्तक हातात धरून संविधान नारा दिला. पण आम्ही त्यांचा बनाव उघड केला. घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विविध गोष्टीतून त्रास देण्याचे काम सातत्याने काँग्रेसने केले. त्यांना भारतरत्न सन्मान देखील त्यांनी जाणीवपूर्वक दिला नाही. संविधानाचा मूळ आत्मा बदलण्याचे काम काँग्रेसने केले. त्याचे उत्तर त्यांनी द्यावे, अशीही मागणी डॉ. रिजिजू यांनी केली.

ReplyForwardAdd reaction

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *