News Bharati

अडचणीचा प्रश्न विचारला म्हणून राहुल यांच्या सहकाऱ्यांनी इंडिया टुडे पत्रकारावर केला हल्ला; मोदींनी काँग्रेसला फटकारले.

इंडिया टुडेचे पत्रकार रोहित शर्मा यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात राहुल गांधी यांच्या टीम मधील माणसांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप केल्याच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जाहीरपणे टीका केली आहे. राहुल गांधी अमेरिकेच्या खासदारांसोबतच्या बैठकीदरम्यान बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचा मुद्दा उपस्थित करतील का, असा प्रश्न शर्मा यांनी विचारल्यानंतर ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.

शर्मा यांनी दावा केला आहे की, त्यांनी हा प्रश्न विचारल्यानंतर, राहुल गांधींच्या टीमच्या सदस्यांनी त्यांचा फोन हिसकावून घेऊन त्यातील मुलाखत डिलीट केली आणि मुलाखतीचा कोणताही मागमूस शिल्लक राहू नये यासाठी त्यांचे आयक्लाउड खाते सुद्धा तपासले. शर्मा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांना बांगलादेशी हिंदूंच्या प्रश्नावर राहुल गांधी यांच्या भूमिकेबद्दल विचारल्यानंतर राहुल गांधींच्या टीम कडून ही आक्रमक प्रतिक्रिया आली.

पंतप्रधान मोदींनी, यावरून काँग्रेसवर ढोंगीपणाचा आरोप केला आहे. एका पत्रकारावर अशा पद्धतीने हल्ला करून काँग्रेसने भाषण स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा गळा घोटला आहे असे ते म्हणाले. त्यांनी या घटनेचा संदर्भ देऊन, काँग्रेसने परदेशात भारताची प्रतिष्ठा कलंकित करून घटनात्मक मूल्ये आणि लोकशाहीप्रती काँग्रेसच्या बांधिलकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

या मुद्द्यावरून विविध समाज माध्यमांवरील पोस्ट्समध्ये अनेकांनी इंडिया टुडेचे पत्रकार रोहित शर्मा त्यांच्यावरील हल्ल्यासाठी काँग्रेसवर टीका केली आहे. याआधी सुद्धा राहुल गांधी यांना जेंव्हा अडचणीचे प्रश्न विचारण्यात आले तेंव्हा त्यांनी त्या पत्रकारांवर भाजपचे अजेंडा चालविणारे म्हणून हेटाळणी केली आहे. यामुळे भाषण स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्या काँग्रेसची दुटप्पी भूमिका यामुळे पुन्हा एकदा उघड झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *