News Bharati

लव्ह जिहाद मुळे महिलांची सुरक्षा धोक्यात : निलेश भिसे

बावधन, पुणे : सध्या सगळीकडे नवरात्रोत्सवानिमित्त स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. नवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. बावधन परिसरातील लोकमान्य हास्य संघाकडून ‘महिला सुरक्षा’ या विषयावर भाष्य करण्यासाठी निलेश भिसे यांना आमंत्रित करण्यात आले होते. सध्या महिला सुरक्षा हा प्रश्न सर्वात गंभीर होत चालला आहे‌, याच पार्श्वभूमीवर महिलांना आपल्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देणे कसे गरजेचे आहे, यावर भिसे यांनी मार्गदर्शन केले.

महिला सुरक्षेसोबतच महिलांच्या धर्मांतराचा मुद्दा सध्या अत्यंत ज्वलंत होत चाललाय. तरूणींना भावनिक जाळ्यात अडकवून त्यांचा फायदा घेणे, त्यांचे धर्मांतर करणे असे वेगवेगळे प्रकार समाजात घडतात. ‘लव्ह जिहाद’ने तरूणींचे मोठे नुकसान होत आहे. या अशा गोष्टींमध्ये तरूणी अडकल्या जाऊ नयेत यासाठी त्यांनी स्वतःची अशी काळजी घ्यावी आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे, याबाबत निलेश भिसे यांनी भाष्य केले.

हिंदू तरूणींना धर्मांतरासोबतच, आपल्या संस्कृती बाबत नकारात्मकता पसरवणे जसे की, स्त्रियांनी मंगळसूत्र घालू नये, कुंकू लावू नये अशा‌ वेगवेगळ्या नकारात्मक गोष्टीही पसरवल्या जात असून समाजासाठी हे अत्यंत धोकादायक आहे. त्यापासून स्वतःची सुरक्षा करणे महिलांना अत्यंत गरजेचे आहे, असेही भिसे यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला महिलांसोबतच पुरूषांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांसोबतच बावधन ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष गोविंदराव कोटगिरे आणि लोकमान्य हास्ययोग संघाच्या अध्यक्षा नीलिमा कलावंत हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना कुंटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अरुणा शाहा यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *