News Bharati

महाराष्ट्रात देवेंद्र पर्वाची सुरुवात! देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे-अजित पवार उपमुख्यमंत्री

मुंबई : महाराष्ट्रात आता \”देवेंद्र पर्व\” सुरू झाले आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या (Maharashtra) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या सोबत, मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawr) यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा हा भव्य शपथविधी सोहळा आज मोठ्या थाटामाटात पार पडला.

या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, 22 राज्यांचे मुख्यमंत्री, देशभरातील नामवंत नेते, साधू-महंत, आणि 40 हजारांहून अधिक नागरिक उपस्थित होते.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. या निकालांनी एक्झिट पोलच्या सर्व अंदाजांना खोटे ठरवत महायुतीने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. राज्यातील 288 पैकी 230 जागांवर महायुतीने विजय मिळवला. मात्र, इतक्या मोठ्या यशानंतरही नव्या सरकारच्या स्थापनेला प्रचंड उशीर झाला. त्यामुळे महायुतीत सर्व काही सुरळीत आहे का? याबाबत चर्चा सुरू झाली होती.

महायुतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समवेत बैठक घेतली. या बैठकीत नव्या सरकारच्या खातेवाटपावर सविस्तर चर्चा झाली होती. त्यामुळे अखेर सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत महाराष्ट्रात नव्या सरकारची स्थापना झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *