News Bharati

वरळी मतदारसंघात गुणरत्न सदावर्तेंची एंट्री; आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार

वरळी : “मी वरळी मतदारसंघात (Worli) निवडणूक लढवणार आणि आदित्य ठाकरे यांना धूळ चारणार”, असे संकेत वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग यायला सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये सध्या आरोप प्रत्यारोपाचे सत्र आहे. दरम्यान, शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) त्यांच्या बालेकिल्ल्यात गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी नुकतंच टीव्ही 9 मराठीशी संवाद साधतांना इच्छा व्यक्त केली.

“वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना धूळ चारण्यासाठी मला निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे आहे. माझी ही इच्छा मी पक्षश्रेष्ठींना कळवली आहे. मी ज्या विचारांच्या लोकांसाठी काम करत आहे, त्यांच्यापर्यंत मी माझ्या भावना पोहोचवल्या आहेत. मी जर वरळीतून लढलो, तर 25 हजाराहून अधिक मताधिक्याने लीड घेईन. तसेच आदित्य ठाकरे यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही”, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “माझं केवळ एवढेच म्हणणं आहे की मी शरद पवारांना घाबरलो नाही, मी कधी ठाकरेंना घाबरलो नाही. त्यांना असं उडवून लावलं. त्यामुळे महायुती माझा विचार नक्कीच करेल. वरळीतील जिजामाता नगरमध्ये असलेल्या 8000 झोपडीवासियांचा मी विकास करेन. त्यांना 600 स्क्वेअर फुटाचे घर देणार आणि एक मोठं रिडेव्हलपमेंट त्या ठिकाणी तयार करणार”, अशी मोठी घोषणा यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *