News Bharati

लोकशाही गुंडाळून ठेवणारे लोकशाही वाचवण्याची भाषा करतात हे दुर्दैव!

भारतामध्ये बहुतांश काळ काँग्रेसने राज्य केले. लोकशाहीचा कसा व किती वापर करावा हे काँग्रेसने आजपर्यंत दाखवून दिले आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी – सत्तेसाठी लोकशाहीचा अनेक वेळा गळा घोटणाऱ्या काँग्रेसने तब्बल १०० वेळा संविधानामध्ये बदलही घडवून आणला आहे.

तीन प्रसंगातून आपण काँग्रेसची ही कुटील नीती समजून घेऊयात.

१)सन १९७५ मध्ये आणीबाणी देशावर लादून देशाच्या लोकशाहीला वाचविण्यासाठी मैदानात उतरणाऱ्या हजारो – लाखो विरोधी पक्षातल्या लोकांना जेलमध्ये टाकून काँग्रेसने एक प्रकारे लोकशाहीच संपविण्याचा प्रयत्न केला. या देशातल्या प्रसारमाध्यमांवर बंदी घालून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी देखील केली.

२)दुसऱ्या प्रसंगामध्ये या देशातील विरोधी विचारांच्या अनेक सरकारांना काँग्रेसने बरखास्त केले. लोकांनी निवडून दिलेली सरकारे बरखास्त करत असताना काँग्रेसने लोकशाहीचा गळाच घोटला होता. राज्यपालांना हाताशी धरून राज्यातील सरकारे बरखास्त करायची व राष्ट्रपती राजवट लावून आपल्याला पाहिजे तसे राज्य करायचे हे काँग्रेसचे धोरण होते. या धोरणामुळेच त्या – त्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचे महत्त्व वाढले. राष्ट्रीय एकात्मतेला एक वेळ धोका पोहोचला तरी चालेल, परंतु हायकमांडच्या मनातील नियोजन पूर्ण करायचेच या हेतूने तत्कालीन राष्ट्रपतींनी देखील अनेकदा चुकीचे निर्णय घेऊन अनेक राज्य सरकारे बरखास्त केली. हा लोकशाहीचा खूनच होता.

३)तिसऱ्या प्रसंगामध्ये विद्यमान पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी व विद्यमान गृहमंत्री श्री.अमित शहा यांच्या मागे वेगवेगळ्या तपास यंत्रणा लावून सन २००३ ते २०१३ या कालावधीमध्ये काँग्रेसने जो त्रास दिला, प्रसंगी श्री.अमित शहा यांना गुजरात मधून तडीपार करण्यापर्यंत खालच्या थराला काँग्रेस पोहोचली. यातून त्यांनी लोकशाहीचा कसा गैरवापर केला हे लक्षात येते.

अशा अनेक प्रसंगातून लोकशाहीचा गळा घोटणारे आज मात्र लोकशाही वाचवण्याची भाषा करत आहेत, संविधानामध्ये सातत्याने स्वतःच्या स्वार्थासाठी बदल करणारेच संविधान वाचवण्याची भाषा करत आहेत हे खरोखरच दुर्दैव आहे. अशा ढोंगी लोकांना आता समाजाने पुरते ओळखले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *