News Bharati

अजित पवार बीडचे पालकमंत्री; पंकजा मुंडे म्हणाल्या, \”बीडचे पालकमंत्रीपद मिळाले असते तर…\”

बीड : महायुती सरकारचा 18 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची (Guardian Minister) यादी जाहीर करण्यात आली आहे. बीड (Beed) जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुणाला मिळेल याकडे सर्वांचंच लक्ष होतं. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन धनंजय मुंडे व पंकजा मुंडे (Dhananjay Munde and Pankaja Munde) यांना लक्ष्य केले जात आहे. त्यांना पालकमंत्रीपद मिळू नये विरोधकांचा सूर होता. परिणामी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे बीडचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे.

बीडच्या पालकमंत्रीपदापासून धनंजय मुंडे यांना दूर ठेवण्यात आल्यानंतर त्यांच्या भगिनी आणि राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी एक वक्तव्य केले आहे. आपल्याला बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर बरं झालं असतं, असं त्यांनी म्हटलं आहे.

मला जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालं आहे. त्यात मी सुखी आहे. मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर मला आनंद झाला असता. कारण मी पाच वर्ष बीडची पालकमंत्री होती. तेव्हा बीडचा विकास चांगला झाला होता. आता जे निर्णय झाले त्याच्याशी असहमती न दर्शवता मी अधिक जोमाने काम करणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. त्या सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

पालकमंत्र्यांची नियुक्ती जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असते, कारण ते स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वय साधतात आणि जिल्ह्याच्या विकासात्मक गरजांकडे लक्ष देतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *