News Bharati

भाजपाला दिलासा…बोरिवली विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी थोपवली

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस ४ नोव्हेंबर आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना बंडखोरी थांबवण्याचे आव्हान होते. यात भाजपने मुंबईतील बोरिवली विधानसभा मतदारसंघातील पहिली बंडखोरी यशस्वीपणे थोपवली आहे. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी अखेर अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप नेते विनोद तावडेंनी त्यांची समजूत काढत हा निर्णय घडवून आणला.

गोपाळ शेट्टींच्या अपक्ष उमेदवारीची चर्चा होत असताना, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. लोकसभा तिकीट कापल्यामुळे नाराज असलेल्या शेट्टींना बोरिवली विधानसभेचे तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती परंतु भाजपच्या तिसऱ्या यादीत संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे शेट्टी यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता.त्यानंतर भाजपचे नेते आशिष शेलार, पियुष गोयल आणि देवेंद्र फडणवीस यांनी शेट्टी यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ४ नोव्हेंबर रोजी विनोद तावडे, किरीट सोमय्या आणि पियुष गोयल यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर, शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले, की मी माघार घेत आहे. मी निवडणुकीत लढण्यासाठी नाही तर पक्षाच्या कार्यपद्धतीसाठी माझा आवाज उठवला होता. इतर पक्षांकडून ऑफर होत्या, परंतु त्यात मला रस नव्हता. पक्षात मतभेद असूनही माझा पक्षावर विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *