News Bharati

संविधानाला धोक्यात आणण्याचे काम काँग्रेसने केले – खा. बृज लालजी

पिंपरी दि.२६ (प्रतिनिधी) महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत नसणारे अनेक बदल काँग्रेस ने केले होते काँग्रेसनेच संविधान धोक्यात आणण्याचे काम अनेकदा केल्याचे परखड वक्तव्य राज्यसभेचे खासदार, उत्तर प्रदेशातील माजी पोलीस महासंचालक मा. श्री. बृज लालजी यांनी केले.

संविधान जागर समिती यांचे वतीने पिंपरी येथील मिलिंद नगर परिसरातील वाल्मिकी आश्रमात आयोजित \”संविधानाचा सन्मान ‘घर घर संविधान\” या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री, अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष दिलीप कांबळे, धनराज बिर्दा , मनोज तोरडमल, संजय धुतडमल, मुकुंद यदमल , बेहेनवाल , गोरक्ष लोखंडे, राहुल कांबळे यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला महर्षी वाल्मिकी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमांसह संविधान उद्देशिका पूजन करण्यात आले. त्यानंतर विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले.

पुढे बोलतांना बृज लालजी म्हणाले, बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात अधिक त्रास काँग्रेसने दिला. बाबासाहेबांचे सहकारी जोगेंद्रनाथ मंडल हे फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेले. परंतु तेथील हिंदूंवर होणारे अन्याय पाहून भारतात परत आले.

संविधानाची महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेली प्रत देऊन उपस्थितांचा सन्मान करण्यात आला तसेच संविधान प्रत उपस्थितांना भेट देऊन \”संविधानाचा सन्मान घर घर संविधान \” उपक्रमाचा महाराष्ट्रातील प्रारंभ करण्यात आला.

सूत्रसंचालन अरुण कराड यांनी तर लोकजागर गीत आसाराम कसबे यांनी म्हटले, आभार नरेंद्र टाक यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वाल्मिकी समाज अध्यक्ष, पिंपरी येथील वाल्मिकी आश्रमाच्या अध्यक्ष, सचिव आणि विविध पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *