News Bharati

मनोज जरांगे निवडणूक लढले नाही तर ते पवारांच्या इशाऱ्यावर हे स्पष्ट – प्रकाश आंबेडकर

सांगली : \”मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा पहिला राजकीय बळी शरद पवार ठरले असून, मनोज जरांगे यांनी जर निवडणूक लढवली नाही, तर ते पवारांच्या इशाऱ्यावर चालत आहेत हे स्पष्ट होते,\” असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख (VBA) ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शुक्रवारी सांगलीत केले.

सांगली दौऱ्यावर असलेल्या ॲड. आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला, ‘शरद पवार हे केवळ मराठा नेते झाले आहेत, अशी स्थिती मराठा आंदोलनामुळे निर्माण झाली आहे. आजपर्यंत ते मराठा आरक्षणाबाबत जरांगे यांची मागणी टाळत आले. मात्र, रत्नागिरीच्या सभेत त्यांनी जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे जरांगे यांच्या मराठा आंदोलनाचा पवार हे पहिला राजकीय बळी ठरतील,’ असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले, ‘‘मराठवाड्यात जरांगे आणि ओबीसी असा उघड लढा आहे. उर्वरित महाराष्ट्रात लढ्याची तीव्रता शाब्दिक नाही पण, मानसिक आहे. विधानसभा निवडणूकीनंतर ओबीसी आरक्षण जाईल असे त्यांची धारणा झाली आहे. उद्धव ठाकरे देखील ओबीसींचे आरक्षण वाढवून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी अनुकुल आहेत. आता शरद पवार यांनीही जरांगेंच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. जरांगे जर निवडणूक लढणार नसतील तर, ते पवारांच्याच इशाऱ्यावर चालत आहे, असे समजू.’’ असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *