News Bharati

एसटी कर्मचाऱ्यांनी संप करू नये; सकारात्मक चर्चेतून मार्ग काढू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी (ST) महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनेकडून सेवा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील एसटींची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. तसेच एसटीच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचेही हाल होत आहेत. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) भाष्य केले. ‘एसटी कर्मचाऱ्यांनी संप करू नये. सकारात्मक चर्चेतून मार्ग काढू,\” असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे. मंगळवारी सकाळपासूनच एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला असून राज्यभरातील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.

याबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल आम्ही उद्या बैठक बोलवलेली असून यापूर्वीही एक बैठक पार पडली आहे. एसटी ही गावोगावी जाणारी आहे. त्यासाठी उद्या बैठक बोलवण्यात आलेली असून त्यात सकारात्मक चर्चा होईल. गणेशोत्सव जवळ आला आहे. अनेक नागरिक खरेदी विक्री करण्यासाठी बाजारपेठामध्ये जाण्यासाठी एसटीचा वापर करतात. त्यामुळे माझे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की तुम्ही संप करु नका. आपण याबद्दल सकारात्मक चर्चा करु आणि चर्चेतून तुमचाही प्रश्न सुटेल”, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *