News Bharati

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘उमेद’ अभियान बचतगटातील महिला एक कोटी राख्या पाठविणार

मुंबई : राज्य शासनाने महिलांसाठी विविध कल्याणकारी योजनांसह ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु केली आहे. या योजनेचा पहिल्या दोन महिन्यांचा लाभ राज्यातील पात्र भगिनींना डिबीटीद्वारे नुकताच वितरित करण्यात आला. या योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. या निर्णयाचा फायदा अडीच कोटीहून अधिक महिलांना होणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने महिलांसाठी कल्याणकारी योजना सुरू करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले आहे. यामुळे राज्यातील बचतगट चळवळीतील उमेद अभियानातील महिला ह्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना एक कोटी राख्या पाठविणार आहेत.

राज्यातील बचत गटाच्या महिलांमार्फत राखी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. राज्यातील ४० हजार गावांतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी पाठविण्यात येणार आहे. शासनाने आणलेल्या नवीन योजनांमुळे सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. १९ ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेला मोठ्या भावाला राखी बांधण्यासाठी ‘चलो मुंबई’ असा नारा गावोगावात महिला देत आहेत. मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन ‘उमेद’ संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांना राखी बांधली जाणार असल्याची माहिती ‘उमेद’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

शासनाने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. महिलाना पिंक रिक्षांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. लेक लाडकी अभियान, महिलांना ५० टक्क्यांपर्यंत मोफत एसटी प्रवास योजना यापूर्वीच सुरु झाली आहे. व्यक्तिचे नाव लिहिताना त्यामध्ये पित्यासोबत आता मातेचे नाव टाकण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या अशा विविध निर्णयांमुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांनी महिलांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील महिलांमध्ये आशा निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांत अधिक योजना आणत आहेत. मुख्यमंत्री हे आपले मोठे भाऊ आहेत, अशी भावना राज्यातील महिलांमध्ये निर्माण होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *